यावल न्युज
तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सध्या सुमारे १२ ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. यंदा मार्च महिन्यात ६ ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षात केवळ ४ ग्राम विकास अधिकारी यावल पंचायत समितीला मिळाले. परिणामी रिक्त पदांची संख्या १० वरून १२ वर गेली आहे.
तालुक्यात एकूण ८३ ग्रामपंचायती. अनेक ग्राम विकास अधिकाऱ्यांना एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळावा लागत असल्याने त्यांच्यावर ताण वाढला आहे. त्यामुळे गावपातळीवरील विकासकामांवर परिणाम होत आहे.
शासनाच्या विविध ग्रामीण विकास योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.
यावर्षी यावल पंचायत समितीमधून काही ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
रजिया तडवी (बोरखेडा खु.)
गणेश सुरळकर (हिंगोणा)
प्रविण कोळी (कासव्या)
चंदु सावकारे (साकळी)
नितीन महाजन (दुसखेडा)
छत्रपाल वाघमारे (पाडळसा)
मात्र, यापैकी फक्त बोरखेडा खु. येथे कैलास मोरे यांची नियुक्ती झाली असून उर्वरित ५ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही ग्रामसेवक उपलब्ध नाहीत.
ग्रामविकासाच्या दृष्टीने ही परिस्थिती गंभीर असून तालुक्यातील ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.