यावल न्युज : जिवन चौधरी
यावल तालुक्यातील दहिगाव व परिसरात दिनांक 10 रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी पावसाने मोठा हाहाकार माजवला. या पावसात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून घरे उध्वस्त झाली असून, अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. या वादळी पावसामुळे मका, केळी, यांसारख्या शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या ताराही तुटल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पत्रकार जीवन चौधरी, नामदेव कुंभार यांच्यासह अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
सध्या या भागातील नागरिक मोठ्या अडचणीत असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी व मदतीचे हात पुढे करावेत, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.