यावल न्युज
बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच 753बी च्या चौपदरीकरण संदर्भात, शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली यावल (फैजपूर) येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गातील 240 कि.मी. अंतराच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित प्रक्रियेस गती मिळाली आहे. तथापि, यावरील जमिनी संपादन व इतर बाबींमुळे शेतकरी व स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर यावल येथे केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अमोल हरीभाऊ जावळे, तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, बबन काकडे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व स्थानिक प्रशासन उपस्थित होते.
बैठकीत संबंधितांच्या समस्या व मागण्या ऐकून घेण्यात आल्या असून, त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी दिले.
या बैठकीस भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चौपडा, यावल व रावेर तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.