यावल बनावट कागदपत्रांचा महाघोटाळा उघड – बनावट कागदपत्र तयार करून शेतीची परस्पर विक्री 12 जणांवर गुन्हा दाखल

यावल | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील बोरावल खुर्द शिवारातील शेतजमिनीच्या व्यवहारात मृत व्यक्तीच्या नावावर थेट खरेदी-विक्री करून लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये एकूण बारा जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घोटाळ्यात रु. 11 लाख 15 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी गु.र.नं. 12/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 319, 351(3), 336(3), 337, 339 व 340 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद श्रीमती कांचन संजय खंडी (वय 52, रा. जालना) यांनी दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी 1995 साली मृत्यू झालेल्या मूळ जमीनमालकाच्या नावावर बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर शासकीय कागदपत्रे तयार करून संगनमताने जमीन व्यवहार केले. या फसव्या व्यवहारात अजित तुळशीदास भंडारी (वय 44), शाम मनोहर मुंडडा, सचिन हेमंत राजपूत, रमेश चंद्रकांत कदम (वय 41), सकलाई दशरथ धनगर (वय 56), शाताराम दशरथ धनगर (वय 39), रविंद्र दशरथ धनगर (वय 34), ईश्वर यशवंत पाटील (वय 62), दिलीप लक्ष्मण धनगर (वय 44), प्रशांत वसंतराव पाटील (वय 45), किशोर सुरेश माळी (वय 33) आणि शेख युसुफ (वय 59) यांचा समावेश आहे.
आरोपींनी वेगवेगळ्या तारखांना बनावट दस्तऐवज तयार करून नोंदणी कार्यालयात नोंदी केल्या व त्यातून शेतजमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करत आर्थिक लाभ उकळला. या फसव्या व्यवहारामुळे फिर्यादीची रु. 11,15,000/- इतकी मोठी आर्थिक हानी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात यावल, पालघर, ठाणे, मुंबई, विरार व जालना येथील आरोपींचा समावेश असून, यावल पोलीस अधिक तपास करीत आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहारांचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व संताप व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने