यावल : किरण तायडे
यावल पंचायत समितीतील प्रशासनात गंभीर शिस्तभंगाचा प्रकार उघड झाला आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी ठरलेल्या कामकाजाच्या वेळेपेक्षा खूप आधीच कार्यालयातून पसार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारी कार्यालयातील ही निष्काळजी वृत्ती नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, शासनाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना वारंवार “साहेब गेलेत, उद्या या” अशी उत्तरे ऐकावी लागत आहेत.
शासनाने सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.15 अशी वेळ निश्चित केली असताना, पंचायत समितीत मात्र ही वेळ केवळ कागदावरच पाळली जाते. प्रत्यक्षात अधिकारी “हवे तसे येतात आणि हवे तसे जातात”. ही प्रशासनाकडून होत असलेली ढिलाई म्हणजे जनतेचा अपमान असल्याची नागरिकांची तीव्र भावना आहे.
नागरिकांनी या प्रकाराविरोधात जोरदार संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
गंभीर बाब म्हणजे, 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी अगदी मोजकेच होते. त्यामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी बा. का. पवार, कनिष्ठ सहाय्यक (जन्म-मृत्यू विभाग) पवन भोई, पेन्शन विभागातील एक कर्मचारी, शिक्षण विभागातील एक कर्मचारी आणि शिपाई मनोज बजाज हे उपस्थित होते. उर्वरित सर्व अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित होते.
नागरिकांचा सवाल आहे — “शासनाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आम्ही वेळेवर येतो, पण अधिकारी-कर्मचारी मात्र वेळेपूर्वी का निघतात?”