यावल न्युज
यावल शहरातील सिनेमा चौकात राजकीय घडामोड घडली. प्रहार जनशक्ती पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पवार,मुफ्ती हारुन नदवी, जिल्हाध्यक्ष. प्रदीपराव पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन तालुकाध्यक्ष मा. प्रभाकरअप्पा सोनवणे, पं.स. गटनेते शेखर पाटील, हाजी शब्बीर शेठ, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, शे. नईम व इतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले.
या वेळी बोलताना मा. शिरीषदादा चौधरी म्हणाले, “काँग्रेस पक्ष ही केवळ राजकीय संघटना नसून एक ऐतिहासिक चळवळ आहे, जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते व सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढते. हे मूल्य मान्य करूनच हे कार्यकर्ते पक्षात सहभागी झाले आहेत.”
जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांनी पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी जनतेने दाखवलेला बंधुभाव अधोरेखित करत काँग्रेसच्या सहिष्णुतेच्या तत्त्वांची आठवण करून दिली. मा. मुफ्ती हारुन नदवी यांनी असे सांगितले की, “जेव्हा अनेकजण सत्तेच्या मोहाने पक्ष बदलत आहेत, तेव्हा हे कार्यकर्ते लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”
या कार्यक्रमात शेख निसार मोमिन, शेख याकूब, गुलाम रजा खान, मुफ्ती फैजान, शेख शाहिद, तन्वीर शेख, सौ. शरीफ कुरेशी, साहिल खान, इरफान खान, कलीम शेख, फजलान खान, माजिद शेख, रेहान खान, दानिश खान, शेख हकीमुद्दीन, मुस्ताक शेख यांच्यासह सुमारे २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.
हा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेस पक्षासाठी नवचैतन्य घेऊन येणारा ठरला असून, येत्या काळात यावल तालुक्यात काँग्रेसचा प्रभाव अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला.